शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास नाही (छायाचित्र : AI )

३५० विद्यार्थ्यांचे अनुभव: शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास नाही

फेब्रुवारी ते मार्च २०२५ या काळात मी पुण्यातील अनेक महाविद्यालयांना भेटी देत होतो. विद्यार्थ्यांशी गप्पा मारत, त्यांच्या जगण्याच्या कहाण्या ऐकत. जवळपास ३५० विद्यार्थी, शिक्षक, कॅन्टीनमध्ये दिवसभर उभं राहणारे कामगार, वसतिगृह चालवणारे लोक, घरभाडे देणाऱ्या विद्यार्थींचे घरमालक, आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्था – हे सगळे मला भेटले.

ह्या फक्त मुलाखती नव्हत्या – ही होती एक ‘रिअलिटी चेक’ची यात्रा. शिक्षण हा शब्द आपण खूप वेळा फक्त पुस्तकांशी, परीक्षांशी जोडतो. पण इथं मला दिसलं की शिक्षण म्हणजे डोक्यावरचं भाडं, दोन वेळचं जेवण, आणि महिन्याच्या अखेरीपर्यंत खिशात राहिलेलं ५० रुपये सुद्धा.

‘पुणे’ भारताचं शिक्षणाचं हृदयस्थान म्हणवलं जाणारं शहर. पण इथे शिक्षण घेणं, हे स्वप्न जितकं मोठं आहे, तितकंच महागडंही. ‘Student Helping Hands’ या संस्थेच्या २०२३ मधल्या सर्व्हेनुसार, पुण्यात शिकणारे तब्बल ६०% विद्यार्थी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातले अनेक जण शिकता शिकता पार्ट-टाईम काम करतायत – केवळ अनुभवासाठी नाही, तर घरचा भार हलका करण्यासाठी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ‘प्रयास’ सारख्या संस्थांनीही यावर ठळकपणे लक्ष वेधलं आहे – वाढती फी, महागडं राहणीमान, आणि कमी संसाधनं यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांसाठी शिक्षण हा संघर्ष बनत चाललाय.

आज शिक्षणाचा खर्च म्हणजे केवळ शैक्षणिक शुल्क नाही. त्यात राहणं, जेवण, प्रवास, शैक्षणिक साहित्य, इंटरनेट आणि इतर अनेक गोष्टी सुद्धा सामील होतात. अनेक खासगी महाविद्यालयांमध्ये एका वर्षाचं शुल्क ₹२ लाखांपासून ₹१० लाखांपर्यंत आहे. राहण्यासाठी विद्यार्थी PG, फ्लॅट किंवा खासगी वसतिगृहांचा पर्याय निवडतात जिथं दरमहा भाडं ₹७००० ते ₹ २५००० पर्यंत असतं. त्यात दरमहा ₹३००० ते ₹ ६००० एवढा जेवणाचा खर्च होतो. प्रोजेक्ट, नोट्स, प्रिंटिंग, सॉफ्टवेअर, इंटरनेट यासाठी वेगळा खर्च होतोच.

सर्व्हे आणि प्रत्यक्ष संवादातून ३५% विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते पार्ट-टाईम काम करतात. कधी डिलिव्हरी बॉय, ऑनलाइन कामं, क्लासेसमध्ये शिकवणं अशा विविध स्वरूपात मिळेल ते काम करतात. काही विद्यार्थी तर रात्री उशिरापर्यंत काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लेक्चरला जातात. अनेक जणांनी शैक्षणिक कर्ज घेतलं आहे ज्यावर ८% ते १२% पर्यंत व्याज लागतो आणि आता ते फेडणं त्यांच्यावर मोठं ओझं झालं आहे.

या सगळ्या आर्थिक ताणामुळे केवळ खिशावर नाही, तर मनावरसुद्धा ताण येतो. अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं की सततच्या पैशाच्या चिंतेमुळे तणाव, डिप्रेशन, झोपेचा अभाव, एकटेपणा यासारख्या मानसिक अडचणी जाणवत आहेत. एका विद्यार्थिनीने नमूद केलं –

पूर्वी माझा अभ्यास खूप चांगला होता, पण आता इतका खर्च आहे की पैशाच्या चिंतेमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही.”

अनेक वेळा मुलं जेवण वगळतात.बऱ्याचदा रात्री जागून अभ्यास करतात, क्लासेस बुडवतात किंवा आजारी असतानाही दवाखान्यात जाणं टाळतात.

छायाचित्र : AI

ग्रामीण भागातून, लहान गावांमधून आलेल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आणखी कठीण आहे. सोलापूरहून आलेल्या ओंकारने सांगितलं –

मी ५ मुलांबरोबर एका खोलीत राहतो, स्वतःच जेवण बनवतो, कॉलेज संपल्यानंतर पार्ट-टाईम काम करतो पण, तरीही महिन्याचे पैसे पुरत नाहीत.”

सरकारी वसतिगृहांची संख्या खूपच कमी आहे, आणि असलेल्या वसतिगृहांची स्थितीही फारशी चांगली नाही.शिष्यवृत्ती मिळवणं आज खूप कठीण झालंय. वेळेवर माहिती मिळत नाही, कागदपत्रं गोळा करणं त्रासदायक असतं, आणि पैसे उशिरा मिळतात.

शिक्षणाचं स्वप्न घेऊन विद्यार्थी पुण्यात येतात, पण इथे आल्यावर ते खर्च, ताण, आणि अडचणींमध्ये अडकतात. त्यांचं जगणं हे दिवस काढण्यासाठीच जास्त असतं. ही परिस्थिती पाहून असं वाटतं की जर योग्य वेळेस योग्य निर्णय घेतले नाहीत, तर उच्च शिक्षण हे फक्त श्रीमंत लोकांपुरतंच मर्यादित होऊन बसेल.

या अभ्यासाच्या शेवटी मी काही ठोस उपाय सुचवले आहेत – जसं की सरकारने वसतिगृहांची संख्या वाढवावी, खासगी महाविद्यालयांच्या शुल्कावर नियंत्रण असावं, विद्यार्थ्यांसाठी आर्थिक नियोजनावर मार्गदर्शन दिलं जावं, आणि सामाजिक संस्था व महाविद्यालयांनी मिळून आर्थिक मदतीसाठी यंत्रणा तयार करावी.

हे उपाय फार मोठे किंवा कठीण नाहीत पण, जर आज हे टाळलं तर उद्याच्या पिढीला शिक्षण घेणं केवळ स्वप्न उरून जाईल.
आजचा विद्यार्थी उद्याचा डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक किंवा पत्रकार असू शकतो – पण आज तो फक्त एका फोटोकॉपीसाठी आपलं जेवण टाळतो आहे.

🔍 अधिक माहिती आणि खऱ्या अनुभवांसाठी वाचा संपूर्ण अहवाल:
📘 “पुण्यातील उच्च शिक्षणाचा खर्च: विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि संघर्ष” – विशाल उबाळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *