सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व
“सामान्य आयुष्य जगताना असामान्य स्वप्न पाहणाऱ्यांना, आयुष्य नेहमीच वेगळ्या उंचीवर नेतं असं म्हणतात.”
मी डॉक्टर वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, शुक्रवार पेठ, पुणे येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असतानाची एक अनोखी आठवण, त्याचे जिवंत उदाहरण वाटतं. दुपारचे तीन वाजले असतील. ऑफिसमध्ये अचानक सात-आठ माणसं आली. हातात पेढ्याचा डबा, हास्याने ओसंडलेली चेहरे. त्यांनी मला सन्मानित केलं, अभिनंदन केलं. खूप आनंद झाला. त्यातला एकजण पुढे आला आणि म्हणाला, “मॅडम, ओळखलं का?”
त्याचं नाव ऐकलं आणि क्षणात माझ्या डोळ्यासमोर आठवणींचा चित्रपट झरझर फिरू लागला.
१९८४ सालची गोष्ट. मी पुणे महानगरपालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत — म्हणजेच नानावाडा शाळेत रुजू झाले होते. शाळेतील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेले. कोणी सकाळी पेपर टाकून यायचं, कोणी दूध वाटप करून. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट – जिद्द आणि शिकण्याची तळमळ.
अशाच त्या वर्गातले दोन खोडकर विद्यार्थी – राजेश येनपूरे आणि हेमंत अर्नाळकर. वर्गात बसायचं त्यांना जरा कमीच आवडायचं! पण मनाने चुणचुणीत. आज समोर उभा होता तोच राजेश – आता पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचा कसबा मतदार संघातील नगरसेवक! एक आत्मविश्वास असलेला, कर्तृत्ववान चेहरा. यशाची पायरी चढलेला एक ‘माझा विद्यार्थी’ समोर उभा होता.
राजेशचा प्रवास अत्यंत सामान्य घरातून सुरू झालेला. घरची गरिबी, आई गहू निवडून घर चालवायची. पण त्याच्या अंगात जिद्द होती. कामाप्रती निष्ठा होती, कष्ट करण्याची तयारी होती. म्हणूनच तो आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात २५ वर्षांपासून कार्यरत आहे. त्याचे सुंदर हस्ताक्षर आणि अभ्यासातील एकाग्रता पाहून मी नेहमी म्हणायचे – “हा मुलगा आयुष्यात नक्की काही तरी मोठं करणार!” आणि तो माझा अंदाज खरा ठरवणारा ठरला.
आज त्याच्याच प्रभागात माझी शाळा असल्यामुळे अनेक शाळेतील उपक्रमांना तो प्रमुख पाहुणा म्हणून यायचा. एक उत्तम वक्ता, विनोदी भाषण करणारा, आणि वेळ पाळणारा नेता म्हणून त्याचं कौतुक वाटायचं.
२०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याने सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला. हे यश त्याने आपल्या कामगिरीतून मिळवलं.
पण मग आली कोरोना महामारी. सगळंच बदललं. आणि राजेश यावेळीही रस्त्यावर उतरून काम करत राहिला. अन्नधान्य वितरण, सॅनिटायझेशन, लसीकरण नोंदणी – हे सगळं तो स्वतः करत होता. २५ एप्रिल २०२१ पर्यंत १३,७९० लोकांची नावनोंदणी त्याच्या पुढाकाराने झाली होती.





पण या सगळ्यामागे एक वेदना लपलेली होती – त्याचं स्वतःचं कुटुंब विखुरलेलं होतं. भाऊ संदीप आजारी, वहिनी आणि मुले वेगळ्या घरी, मुलगी आणि पत्नी कोथरूडला – संसर्ग टाळण्यासाठी.
पण स्वतःच्या घरापेक्षा नागरिकांचं भलं महत्त्वाचं मानून तो आजही रस्त्यावर होता. कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असोत – सगळ्यांनी घरदार विसरून समाजासाठी काम केलं होतं. राजेश याने त्या काळात सांगितलेलं एक वाक्य अजूनही मनात आहे – “कोणीही कोणत्याही पक्षावर अकारण टीका करण्याआधी शंभरदा विचार करा. आम्हीही तुमच्यासारखंच कुटुंब असलेले माणूस आहोत.”
राजेश येनपूरे यांचा प्रवास हेच दाखवतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, जिद्द, मेहनत आणि संवेदनशीलता यांची साथ असेल तर कोणताही सामान्य माणूस असामान्य ठरू शकतो.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं — “ज्यांनी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी यश नेहमीच दार उघडून ठेवतं.”
सुंदर लेख