छायाचित्र: cyber peace foundation

सायबर गुन्ह्यांचा नवा चेहरा तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे समोर येतो. आपले जीवन अधिक सोयीचे, जलद आणि प्रभावी झाले आहे, पण याच प्रगतीमुळे गुन्हेगारीचाही चेहराच बदलला आहे. डिजिटल व्यवहार, सोशल मीडिया, ऑनलाइन बँकिंग यामुळे सुविधा वाढल्या असल्या, तरी सायबर गुन्हेगारही अधिक चलाख, आधुनिक आणि धोकादायक झाले आहेत. आता गुन्हे फक्त रस्त्यांवर होत नाहीत, ते मोबाईल, लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून आपल्या खाजगी जीवनात घुसखोरी करू लागले आहेत. आता गुन्हेगार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन फसवणुकीचे डाव आखत आहेत. त्यातीलच एक धोकादायक प्रकार म्हणजे बनावट अटक घोटाळा. या घोटाळ्यात सामान्य नागरिकांना कायदेशीर अडचणीत अडकल्याची भीती दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जातात.

घोटाळ्याचा प्रकार कसा असतो?

बहुतेक वेळा ही फसवणूक एका अनपेक्षित फोन कॉलने सुरू होते. कॉल करणारी व्यक्ती स्वतःला पोलीस अधिकारी, CBI, ED किंवा इंटरपोलचा अधिकारी असल्याचे सांगते. अत्यंत विश्वासार्ह आणि अधिकारवाणीने बोलणाऱ्या या व्यक्तीचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पटकन पडतो.

फसवणूक करणारे सांगतात की, तुमच्या नावावर गंभीर गुन्हा नोंदवला आहे – मनी लॉन्डरिंग, ड्रग तस्करी, आर्थिक गैरव्यवहार किंवा आंतरराष्ट्रीय फसवणूक. अचानक असे ऐकून कोणालाही भीती वाटणे स्वाभाविक आहे आणि नेमकी याच गोष्टीचा फायदा घेतला जातो.

गुन्हेगार केवळ फोनवरच मर्यादित राहत नाहीत, तर व्हिडीओ कॉल करून बनावट सरकारी ओळखपत्रे, अटक वॉरंट किंवा समन्स दाखवतात. कधी कधी पार्श्वभूमीला पोलीस स्टेशन किंवा सरकारी कार्यालयासारखा Virtual Background ठेवला जातो, त्यामुळे सर्वकाही अधिक खरी वाटते.

“सुटायचं असेल तर पैसे भरा!”

फसवणूक करणारे बळी ठरलेल्या व्यक्तीला सांगतात की, तातडीने पैसे भरले नाहीत तर अटक टाळता येणार नाही. त्यासाठी बँक खात्यात ट्रान्सफर, क्रिप्टोकरन्सी किंवा गिफ्ट कार्डच्या स्वरूपात पैसे मागितले जातात.

कधी कधी त्याहूनही एक पाऊल पुढे जात, ते सांगतात की, “तुमच्या बँक खात्याचा वापर बेकायदेशीर व्यवहारांसाठी केला गेलाय, आणि तपासणी होईपर्यंत संपूर्ण रक्कम सरकारी खात्यात ट्रान्सफर करावी लागेल.” सरकारी प्रक्रिया आणि कायदेशीर शब्दांचा उल्लेख केल्यामुळे लोक भीतीपोटी पैसे पाठवतात आणि मोठ्या फसवणुकीला बळी पडतात.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसरही अपवाद नाही

नुकताच प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकुश बहुगुणा या घोटाळ्याचा बळी ठरला. त्याने स्वतः सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला.

“मी तीन दिवस कुठेच नव्हतो… काही स्कॅमर्सनी तब्बल ४० तास मला तणावाखाली ठेवलं. मी पैसे गमावले, मानसिक शांतता हरवली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक माझ्यासोबत होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.”

अंकुशला मनी लॉन्डरिंग, ड्रग तस्करी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये अडकल्याचे सांगण्यात आले. त्याला व्हिडीओ कॉलवर एका पोलिस अधिकाऱ्याशी जोडण्यात आले, जो गणवेशात होता आणि पार्श्वभूमीला पोलिस स्टेशन दिसत होते. त्याने बाहेरच्या कोणाशीही संपर्क न करण्याच्या सूचना दिल्या, फोन आणि सोशल मीडिया बंद ठेवण्यास भाग पाडले. सततच्या दबावामुळे त्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन केलं.

घोटाळ्यापासून बचाव कसा करावा?

सरकारी अधिकारी फोनवरून किंवा व्हिडीओ कॉलद्वारे अटक वॉरंट जारी करत नाहीत.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँकेची गोपनीय माहिती देऊ नका.
जर संशयास्पद कॉल आला, तर तो त्वरित कट करा आणि पोलिस किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन (1930) वर संपर्क साधा.
कोणत्याही परिस्थितीत घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका.

सायबर गुन्ह्यांची स्वरूपं सतत बदलत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं, योग्य सावधगिरी बाळगणं आणि कोणत्याही दबावाखाली चुकीचे निर्णय न घेणं गरजेचं आहे. फसवणुकीपासून स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवा!

visit –

silentscreams_66d

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *