चरितार्थ चालवण्यासाठी अनेक क्षेत्रे असतात, पण शिक्षकी पेशा हे खरे तीर्थक्षेत्र आहे, असे मी नेहमी ठामपणे सांगते. ३३ वर्षे शिक्षिका आणि त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतरही माझा हा विश्वास अजून दृढच झाला आहे. शिक्षकी पेशातील सर्वात सुंदर बाब म्हणजे विद्यार्थ्यांशी होणारी निखळ मैत्री! ही श्रीमंती फक्त आणि फक्त शिक्षकालाच लाभते. “आनंद आणि समाधान हीच माझी खरी संपत्ती” असे मला नेहमी वाटते. शिक्षक हा मातृहृदयी असावा, त्याच्या बोलण्यात निर्मळ मैत्रीचा जिव्हाळा असावा, कारण यामुळे मुलांचे दडपण कमी होते आणि शिक्षण आनंददायी वाटू लागते. वर्गातील वातावरणही अधिक प्रेरणादायी बनते.
मला अभिमानाने सांगावेसे वाटते की मला पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मला आठवते, पूर्वी अनेक सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. प्रत्येक वर्गात शंभराहून अधिक विद्यार्थी असायचे. दहावीच्या वर्गात तर ही संख्या १२०-१२५ पर्यंत पोहोचायची. अशा परिस्थितीत वर्गात फिरणेही कठीण होत असे. पण मागील काही वर्षांत अनेक सरकारी शाळा विद्यार्थ्यांच्या कमी उपस्थितीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
सरकारी शाळांमधील बदलती परिस्थिती
शिक्षकांची अनुपलब्धता, अपुऱ्या सुविधा आणि पालकांचा विश्वास कमी होणे यामुळे सरकारी शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शालेय शिक्षणातील असमानता वाढत असून गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी कमी होत आहेत.
आज पालक आपल्या मुलांना खासगी शाळेत घालण्यास प्राधान्य देतात. फीच्या मोबदल्यात आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध शिक्षणपद्धती आणि चांगली शैक्षणिक गुणवत्ता मिळेल, अशी त्यांची अपेक्षा असते. पण सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांची परिस्थिती वेगळी असते. अनेक पालकांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक खर्च करणे शक्य नसते, त्यामुळेच त्यांच्या मुलांची निवड सरकारी शाळांसाठी होते.
या शाळांमध्ये शिकणारी मुले हातावर पोट असलेल्या गरीब कष्टकऱ्यांची असतात. परिस्थिती बदलण्याची जिद्द त्यांच्यात असते, पण त्यांना योग्य दिशा दाखवणाऱ्या मदतीची गरज असते. आणि ती मदत म्हणजे सरकारी शाळा. मात्र शिक्षणाचे खासगीकरण होत असताना या विद्यार्थ्यांसाठीचा हा मदतीचा हात हतबल होतो आहे, असे वाटू लागले आहे.
विद्यार्थ्यांसोबतचे अविस्मरणीय अनुभव






माझ्या कारकीर्दीत अनेक विद्यार्थी भेटले, काही सहज शिक्षण घेत असत, तर काहींसाठी शिक्षणच एक संघर्ष होता. अशाच एका प्रसंगाची आठवण आजही ताजी आहे.
मी एका नववीच्या वर्गात गणित शिकवत होते. उदाहरणे वहीत लिहून घ्यायला सांगितले, पण बरीच मुले लिहित नव्हती. काहींना शिक्षणात रस नव्हता, तर काही जण भीतीपोटी लिहीत नव्हते. वर्गातील एका मोठ्या विद्यार्थ्याने पुढे येऊन जाहीर केले, “कोणीही लिहून घ्यायचे नाही. जर कोणी लिहून घेतले, तर मधल्या सुट्टीत त्याला हाता खालून काढीन!” त्याच्या धमकीला घाबरून बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिणे टाळले.
मी काही दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष केले. एक दिवस फळ्यावर उदाहरण दिले आणि वर्गात फिरू लागले. पाहते तर काय, त्याने ते अचूक सोडवले होते! मी त्याला लगेच शाबासकी दिली, संपूर्ण वर्गाला त्याची वही दाखवली. तो आनंदाने फुलून गेला. त्याच्यातील नेतृत्वगुण मला जाणवले, म्हणून त्यालाच अभ्यास तपासण्याचे जबाबदारी दिली. हळूहळू त्याचे वागणे बदलू लागले.
असाच एक प्रसंग. एका विद्यार्थ्याने वर्गात मोठ्याने गाणे म्हणायला सुरुवात केली. सगळ्यांना वाटले, आता मी चिडेन आणि शिक्षा करेन. पण मी तसे न करता त्याला गाणे पूर्ण करायला सांगितले. त्याचा आवाज खरंच खूप गोड होता! मी त्याचे कौतुक केले आणि चांगल्या गुरूकडे गाणे शिकण्याचा सल्ला दिला. अशा छोट्या-छोट्या प्रसंगांतून मी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेतले.
या मुलांना वेगळ्या पद्धतीने हाताळावे लागते. ते सहज बोलतानाही शिव्या द्यायचे, मधल्या सुट्टीत पळून जायचे. एकदा, पितृपंधरवड्यात, मला नवा शोध लागला – मुले घरी जाण्यासाठी खोट्या चिठ्ठ्या आणायची! “आजीचे दोनदा श्राद्ध असते,” असे सांगायची. मला समजलं की इथे खूप वेगळ्या प्रकारे काम करावे लागेल.
एकदा एका विद्यार्थ्याला विचारले, “मोठेपणी तुला काय बनायचे आहे?”
तो निर्धाराने म्हणाला, “मला डॉन व्हायचे आहे!”
हे ऐकून वर्गातील सगळे हसले, पण माझ्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. तो ज्या परिस्थितीत राहत होता, त्यामुळे त्याच्या मनात असे विचार येत होते. ही मुले कधी दूध विकत होती, कधी पेपर टाकत होती, पण तरीही आनंदी असायची. त्यांच्या जगण्याच्या जिद्दीने मला जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला. मुलांना समृध्द करता करता मी स्वतः ही खूप समृध्द झाले.
माझ्या आठवणीतला अजून एक विद्यार्थी – त्याचे डोळे नेहमी लालसर दिसायचे. शिक्षक म्हणाले, तो व्यसनी आहे. त्याला शाळेतून काढून टाका. मी एक दिवस त्याला विश्वासात घेतले. आधी तो रडू लागला, मग शांत झाल्यावर म्हणाला,
“मॅडम, पैशाच्या वादातून माझ्या काकांनी माझ्या डोळ्यासमोर वडिलांचा खून केला. त्या प्रसंगाची कटुता डोळ्यांसमोरून जात नाही…”
तो सांगत होता आणि माझे मन सुन्न झाले. मी त्याला खूप समजावले, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आज तो कोर्टात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. रस्त्यात भेटला तरी वाकून नमस्कार करतो.
सरकारी शाळेतील चमकते तारे – यशाच्या शिखरावर!



शाळेतील आठवणी आणि सरकारी शिक्षणाचा विचार
शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम करत असताना आलेले अनुभव आजही माझ्या मनात ताजे आहेत. शाळेच्या समोर असलेल्या डायस प्लॉट वसाहतीतील विद्यार्थ्यांना शाळेत यायचे नसे. तेव्हा मी काही दिवस त्या वसाहतीत फक्त फेरफटका मारत राहिले, कोणालाही काहीही न सांगता. आणि मग हळूहळू विद्यार्थी शाळेत यायला लागले. त्या वर्षी शाळेचा दहावीचा निकाल ४०% वरून ८०% वर गेला. तो आनंद अवर्णनीय होता. त्यावेळी मला खात्री पटली—जर आपण मन लावून प्रयत्न केले, तर परिस्थितीत निश्चित बदल घडवता येतो.
काही वर्षांनी माझ्या १९८३-८४ च्या दहावीच्या बॅचने स्नेहमेळावा आयोजित केला. त्या वेळी एका विद्यार्थ्याने आठवण सांगितली—”मॅडम, एकदा मला आणि माझ्या मित्राला ताप आला होता. आम्ही बेंचवर डोकं टेकवलं होतं. तुम्ही आमची तब्येतीची विचारपूस केली, शिपायाला औषध आणायला सांगितलं आणि तुमचा डबा आम्हाला दिला.” ही घटना मला विस्मरणात गेली होती, पण त्या विद्यार्थ्याच्या मनात ती घट्ट कोरली गेली होती. त्याक्षणी मला कळलं, शिक्षकाची एक छोटीशी कृतीही विद्यार्थ्यांच्या मनावर खोल प्रभाव टाकते.
शिक्षणाच्या संधी आणि सरकारी शाळांची भूमिका

स्वातंत्र्यानंतर सरकारी शाळांनी शिक्षण सर्वदूर पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. आज अनेक मोठे नेते, अधिकारी, संशोधक आणि कलाकार या शाळांमधून शिकून पुढे गेले. उदाहरणार्थ, डॉ. माशेलकर यांच्यासारखे महान व्यक्तिमत्त्व सरकारी शाळांमध्ये शिकले. सरकारी शाळांचे मुख्य ध्येय नेहमीच स्पष्ट राहिले आहे—’शिक्षणाचा हक्क आणि सर्वांसाठी समान संधी’.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत होते, आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात होता. काही शाळांमध्ये समृद्ध ग्रंथालये, मोठी मैदाने, प्रयोगशाळा आणि खेळासाठी उत्तम सुविधा होत्या. मात्र, काही ठिकाणी या सुविधांचा अभाव होता. मुलामुलींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नव्हती. स्वच्छतेचा अभाव ही अनेक शाळांमधील गंभीर समस्या होती. सरकारी योजना जसे की अनुसूचित जाती-जमाती आणि कचरा वेचक पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत होता.
आजच्या सरकारी शाळांची स्थिती आणि आव्हाने
आज मात्र पूर्वीच्या सरकारी शाळा राहिल्या नाहीत असे वाटते. ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (ASER) चा अहवाल सरकारी शाळांच्या कार्यपद्धतीवर झोत टाकतो. काही उदाहरणे:
- आठवीतील २५% विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तरावरील उतारा वाचता येत नाही.
- ४०% विद्यार्थ्यांना वजाबाकी आणि भागाकाराचे गणित जमत नाही.
या समस्यांचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारी शाळांवर पुरेसा खर्च करण्याची सरकारची मानसिकता नाही. अपुरे मनुष्यबळ आणि विविध सरकारी योजनांची जबरदस्तीने अंमलबजावणी यामुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या शिक्षकांवर मोठा ताण येतो.
शाळांमध्ये मुलामुलींसाठी स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, स्वतंत्र किचनगृह यांसारख्या मूलभूत सुविधा आवश्यक आहेत. मात्र, त्यांना प्राधान्य दिले जात नाही. यावर उपाय म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे.
समाधान आणि पुढील वाटचाल
सरकारी शाळांमध्ये ‘स्कील-बेस्ड एज्युकेशन’ काही प्रमाणात राबवले जाते, पण त्याचा व्यापक प्रसार गरजेचा आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि तांत्रिक शिक्षण दिल्यास सरकारी आणि खाजगी शाळांमधील दरी कमी करता येईल. तसेच, त्यांना भविष्याच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील.
माझ्या पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक बंधू-भगिनींना एवढंच सांगावंसं वाटतं—तुम्ही उत्तम काम करत आहात. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची ताकद आहे. आपण त्यांना योग्य दिशा देऊ शकतो.
आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोनच सर्वात जास्त उपयोगी पडतो. तो निर्माण करणे ही आपली भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी आपण अधिक वेळ द्यायला हवा.
संकल्प – उज्ज्वल भविष्यासाठी

चला, नवीन वर्षाचा संकल्प करूया—
“भान हरपून काम करण्याचा, मग बघा, एक दिवस असा येईल की आपल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पहाटेपासून रांगा लागतील!”
त्या दिवशी तुम्हीही हेच म्हणाल—
“आज सोनियाचा दिनु म्या पाहिला!”
सौ. सीमा पोपटराव चव्हाण
माजी मुख्याध्यापिका,
डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन, शुक्रवार पेठ, पुणे
खूप छान लेख लिहिला आहे माजी मुख्याध्यापिका
सौ सीमा पोपटराव चव्हाण ह्यानी. त्यांची शाळा आणि विद्यार्थी साठी त्यांची तळमळ ही प्रकर्षाने जाणवते.
सीमा ताई.
तुझा लेख संपूर्ण वाचला. खुपच अभिमान वाटतो आहे. तूझ्या सारखी आदर्श शिक्षिका सर्वाना नेहमीच लाभो. या देशातील सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात. तुमची शाळा पुणे महानगर पालिकेची असूनही शंभर टक्के निकाल दरवर्षी असतो हे सुद्धा नक्कीच अभिमानास्पद आहे.
सौ सीमा चव्हाण ह्यांचा लेख खूपच सुंदर आहे.
त्यांचे सर्व अनुभवाचे बोल आहेत.
केलेल्या कामाच्या अधिकारामुळे त्यांच्या लेखाला खूपच महत्त्व आले आहे.
धन्यवाद.
Very good
सुंदर अणि मार्गदर्शक लिखाण
सीमाताई, गुमचा लेख माझ्या 45 वर्षे 10वी व 12 वी च्या मुलांना शिकवितान आलेला अनुभव वेगळा नाही. मी देहू, पुणे, पंढरपूर,पढगा, इ. ठिकाणी मुलांना इंग्रजी विषय शिकवला. सर्वठिकाणी मुले सारखीच वाटली कोणी खोडकर थोडी वाया गेलेली पण आपण जीव लावला तर जीव देणारी अगदी आपल्या मुलांपेक्षा थडी जास्तच, कदाचित जागेपणी आपण त्यांच्या बरोबर जास्त वेळ घालविला असेल .शिक्षकिपेशा पेक्षा महान पेशा दुसरा नाही. मी माझ्या मुलांना 16 वर्षे IUCAA मध्ये, IIT पवई येथेनेवून विज्ञानाची प्रदर्शने दाखवत होतो आम्ही महाराष्ट्रातील बहुतेक किल्ले इतिहास संशोधकांना बरोबर घेऊन दाखविले. जयंत नारळीकर, अजित केमभावी, अरविंद गुप्ता सारख्या शास्त्रण्याबरोबर संवाद घडविला तर कधी सलीम अली सारख्या पक्षी तज्ञाबरोबर एक दिवस त्यांनी पक्षावर केलेल्या संशोधनावर चर्चा करण्यात घालवीला. खरंच माझा शिक्षक म्हणून जीवन प्रवास या मुलांमुळेच समृद्ध झाला जीवनाला अर्थ या मुलानं मुळेच प्राप्त झाला. मी स्वतःला देवाचा सर्वात प्रिय व्यक्ती समजतो कारण हे सर्व मुलांमुळेच मला मिळू शकले. माझ्या मुलाला मी शास्त्रज्ञ् बनविले कदाचित यातूनच प्रेरणा मिळाली. खूप बोलता येईल पण तुमी मुलांना IUCAA मध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारीला विज्ञान दिनी घेऊन या मी तेथेच त्यांच्या समवेत राहतो. धन्यवाद श्रीकांत बा. मोरे