“माणूस एकटा जन्मतो आणि एकटाच मरण पावतो”, असं सामान्यतः मानलं जातं. पण माझं मत थोडं वेगळं आहे. कोणीही रिकाम्या हाती येत नाही. माणसाची आयुष्यभराची सारथी असते ती त्याची कला. कला ही केवळ एक अभिव्यक्ती नाही, ती माणसाचं अस्तित्व दर्शवणारी शक्ती आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीत अनेक लोककला प्रकार विकसित झाले. त्यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे लावणी.
लावणीचा समृद्ध वारसा
लावणी हा महाराष्ट्राच्या लोककलेचा शृंगार आहे. तिचा इतिहास ५०० वर्षांहून अधिक प्राचीन आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीत लावणीने विशेष स्थान मिळवलं. ती केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर सामाजिक संदेश देणारं माध्यमही आहे. दुर्दैवाने आजही अनेकांना हे ठाऊक नाही की, लावणीचे तब्बल ६९ प्रकार आहेत.
अतिप्राचीन काळी, जेव्हा स्त्रियांना मंचावर सादरीकरण करण्यास बंदी होती, तेव्हा पुरुष कलावंत लावणी सादर करत. ते आपल्या कुटुंबासह दौऱ्यावर असत. त्या काळातील समाजाने या कलेला स्वीकारलं आणि तिला प्रतिष्ठा दिली. मात्र, आजच्या काळात पुरुष लावणी कलाकारांबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.
पुरुषांनी लावणी सादर करण्यावरील पूर्वीचा आणि आजचा दृष्टिकोन
मागील काही दशकांमध्ये लावणीच्या सादरीकरणामध्ये मोठे बदल झाले. पारंपरिक लावणी ही रंजक, कलात्मक आणि भावनात्मक अभिव्यक्तीने परिपूर्ण होती. मात्र, आजकाल लावणीला केवळ एक मनोरंजनाचं साधन म्हणून सादर केलं जात आहे. त्यामुळे तिचं स्वरूप विकृत होत आहे. त्यातूनच लावणी ही केवळ स्त्रियांनी सादर करायची कला आहे, असा अपसमज निर्माण झाला आहे.
मी स्वतः एक लोककलावंत आहे. गोंधळ, जोगवा, वाघ्या-मुरळी यांसारख्या विविध लोककला प्रकारांसोबत मी लावणीही सादर करतो. आधुनिक नृत्यप्रकार शिकूनही लोकांचं लक्ष केवळ माझ्या लावणी सादरीकरणाकडे जातं. पुरुष उत्तम लावणी सादर करू शकतो, यावर अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही. यामागचं कारण म्हणजे लावणीच्या इतिहासाची अनभिज्ञता. जी लावणी पूर्वी पुरुषांनी सादर केली, तीच कला आज टिकवण्यासाठी पुरुषच झगडत आहेत. ही मोठी शोकांतिका आहे.
संस्कृती जपत असताना तिचा खरा अर्थ हरवतोय का?
आजच्या काळात संस्कृतीच्या जागराच्या नावाखाली अनेकदा तिचं स्वरूप बदललं जात आहे. लावणी ही शृंगारिक, मनमोहक आणि सौंदर्यपूर्ण लोककला आहे, पण ती अश्लीलतेकडे झुकणारी नाही. ती रंजक शैलीत सामाजिक संदेश देणारी होती. मात्र, अलीकडच्या काळात लावणीचं स्वरूप विकृत करून ते बाजारू पद्धतीने सादर केलं जात आहे. त्यामुळेच अनेकांना वाटतं की लावणी हा खालच्या थराचा लोककला प्रकार आहे. हाच समज तिच्या अस्तित्वावर मोठं संकट निर्माण करत आहे.
हरवणाऱ्या कलेचं पुनरुज्जीवन – आपली जबाबदारी
लोककलेच्या जतनासाठी आणि तिचा खरा गौरव टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. पारंपरिक लावणीला योग्य दर्जा आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. तिच्या शुद्ध, निखळ रूपाची जपणूक झाली पाहिजे. लावणी ही केवळ एक नृत्यशैली नाही, ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पारंपरिक लावणी वाचवणं ही केवळ कलाकारांची नव्हे, तर समाजाचीही जबाबदारी आहे.
आपणच आपल्या संस्कृतीची काळजी घेतली नाही, तर उद्या ती कायमची हरवेल. म्हणूनच लावणी जिवंत ठेवायची असेल, तर तिचं खरं स्वरूप समजून घ्यायला हवं आणि ती प्रामाणिकपणे सादर केली पाहिजे.
ओम तांबे यांची लावणी झलक पाहण्यासाठी वार्ताहरच्या इंस्टाग्रामला भेट द्या: इथे क्लिक करा