माळीण भूस्खलन – हरवलेल्या घरांची वेदना आणि नव्याने उभारी घेण्याची आस(छायाचित्र स्रोत: The Hindu)

आपला महाराष्ट्र जिल्हा हा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध अंगांनी नटलेला प्रदेश आणि देवाने निसर्गरूपी केलेली त्यावरची कृपा म्हणजे अलौकिक चमत्कारच. निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. माणसाचं जगणं हे त्याच्या समृद्धीत दडलेलं आहे. पण आज बहुतांश वेळी त्याची अवहेलना होताना दिसून येते आणि माणसाचं जीवन कोलमडून जातं.

अलीकडे १९ जुलै २०२३ रोजी पावसाच्या प्रचंड आवेगाने रायगड जिल्ह्यातील इरशाळगडावरील इरशाळवाडी या गावात दरड कोसळण्याचा अतिशय भयानक प्रकार घडल्याचं समोर आलं. हे गाव समुद्रसपाटीपासून १२०० मीटर अंतरावर गडाच्या केंद्रस्थानी वसलेलं आहे. २८८ लोकसंख्या असलेल्या या गावात १४२ लोकांना भूस्खलनाचा तीव्र परिणाम झाला. अनेक जण जखमी झाले, काही आजही बेपत्ता आहेत, तर काहींना आपले अमूल्य प्राण गमवावे लागले. गेल्या दहा वर्षांत ही महाराष्ट्रातील तिसरी भूस्खलनाची घटना आहे. दर दोन वर्षांनी असं काहीतरी रौद्र संकट येतं आणि निघून जातं. आपण मात्र ते निमूटपणे टीव्हीवर पाहतो आणि शोक वाटल्याचं आश्चर्य बाळगून शांत बसतो.

आज भारत आधुनिकतेच्या क्षेत्रात उच्चांक गाठू पाहतोय. अमेरिका, जर्मनीसारख्या प्रगत देशांशी बरोबरी करू पाहतोय. पण हे सारं करून उपयोग काय, जर त्याचा उपभोग घेणारी जनताच संपू लागली, तर? एखादा माणूस गेला की सरकार त्याची किंमत ठरवून मोकळं होतं, पण परिस्थितीचं काय? ती तशीच राहते. विकासाचा झेंडा तिथपर्यंत कधीच पोहोचत नाही. किंबहुना, आपापल्या झेंड्यात रमलेल्यांना तो कधी दिसलाच नाही, असं म्हणावं लागेल दुर्दैवाने.

मागच्या आठवड्यात मी माळीण गावाला भेट देऊन आलो. कोणतं माळीण गाव?
अहो, इतक्यात विसरलात?

9 Years of Malin Village Landslide Photos Pune Ambegaon News | एक होतं  माळीण! १५१ मृतदेह, ४४ घरं डोंगराखाली; थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेला नऊ वर्ष  पूर्ण | Maharashtra Times
(छायाचित्र :इंडिया टाइम्स )


३० जुलै २०१४ रोजी ज्या गावाला भूस्खलनाचा तीव्र झटका बसला, भूस्खलनाच्या परिणामस्वरूप दीडशेहून अधिक निष्पाप मानवांना, अनेक चिमुरड्या लेकरांना आपला जीव गमवावा लागला, ते माळीण गाव.

पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस असलेल्या आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या सभोवताली पसरलेल्या डोंगराळ भागात वसलेलं हे छोटंसं गाव माळीण. पुणे शहरापासून अवघ्या १५०-१७५ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. संध्याकाळच्या प्रहरी, सुमारे सहा वाजता, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर देवस्थानाचे दर्शन घेऊन मी (कुटुंबासमवेत) माळीण गावाच्या रस्त्याकडे गाडी वळवली. डिंभे गावाच्या मुख्य चौकातून सव्वीस कि.मी. अंतरावर हे गाव आहे. प्रवास सुरू झाला. आम्हाला यात महत्त्वपूर्ण साथ लाभली ती डिंभे धरणाची आणि डोंगररांगांची. डिंभे धरणातलं एकसंध गतीने वाहणारं निर्मळ, निखळ पाणी आणि त्या निर्मळ पाण्यावर सूर्याची अलगद पसरणारी किरणं… सूर्य अस्ताला जाण्याचा तो जणू इशाराच! मन प्रसन्न करणारं विलोभनीय दृश्य डोळ्यांच्या नाजूक कोपऱ्यात साठवून ठेवावंसं वाटतं. निसर्ग किती विविध रंगांनी, ढंगांनी सजलेला आहे, याची पुनश्च अनुभूती मिळाली. पण हाच सुंदर वाटणारा निसर्ग घातकही ठरू शकतो.

पंधरा कि.मी. पुढे गेल्यावर दिसणारं घनदाट जंगल, मोठमोठी झाडं, सह्याद्रीच्या दूरपर्यंत पसरलेल्या रांगा, हे सारंच चित्र मनात भीतीची पालवी फुलवू पाहत होतं. घनदाट जंगलातून वाट काढत जाणारा घाटातील अरुंद रस्ता… रस्त्याच्या एका बाजूला डोंगरमाळा, तर दुसऱ्या बाजूला धरणाचं प्रचंड विशाल पात्र! आता मात्र मनात खूप भय निर्माण होऊ लागलं. पण तरीही माळीण गावाला, तेथील वासियांना भेट देण्याची सुप्त इच्छाशक्ती आम्हाला त्या गावात घेऊन गेली. डोंगराच्या एका कड्यावर, अतिशय दुर्गम परिसरात वसलेलं हे गाव. गावच्या मुख्य चौकात पोहोचल्यावर एक पाटी दिसली. उजव्या हाताला ‘जुनं माळीण’ तर डाव्या हाताला ‘पुनर्वसन केलेलं नवीन माळीण’ असं लिहिलं होतं त्या पाटीवर. मन घट्ट करून आम्ही प्रथम उजवीकडे वळलो. अर्धा कि.मी. पुढे गेल्यावर एक शाळा नजरेस पडली. हो, ही तीच दुर्घटनेतून वाचलेली एकमेव वास्तू! पुढे गेल्यावर या दुर्घटनेत मृत पावलेल्या निष्पाप जीवांची बांधलेली समाधी नजरेस आढळली. आम्ही त्या समाधीचं दर्शन घेतलं आणि निसर्गाचं हे सारं चित्र डोळ्यांमध्ये टिपून घेतलं.

हे सारं अनुभवताना महाराष्ट्राच्या इतिहासातला तो काळा दिवस वाऱ्याची झुळूक वाहावी तसा चटकन दृष्टीसमोरून गेला. त्या घटनेनंतर आजपर्यंत टीव्हीवर पाहिलेलं आणि भूगोलाच्या, विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात बघितलेलं माळीणचं ते दाहक दृश्य आज प्रत्यक्ष बघताना, अनुभवताना कंठ दाटून आला, मन भरून आलं. माणुसकी या एकमेव धर्मासाठी मनात साठलेल्या सगळ्या संवेदना एका क्षणात जागृत झाल्या. सोबत नयनांतून आपुलकीचा पवित्रा सावरत अश्रूंचा ओघ अलगद गालावरून ओघळत गेला. मनाला सावरत, समजावत आम्ही नवीन वसवलेल्या माळीण गावाचं स्वरूप टिपण्यासाठी चौकातून डावीकडे गेलो.

कंठ दाटून आल्याने मला तहान लागली होती. एका दारात पाणी मिळेल का, अशी विचारपूस मी केली. एक सद्गृहस्थ बाहेर आले, आणि पाठोपाठ एक आजी पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आल्या. आम्ही पाणी पिऊन घेतलं. मग त्या सद्गृहस्थांशी बोलण्याचा मोह आवरला नाही, म्हणून संवाद साधला. ते कुटुंब पूर्णपणे शेतीच्या जोरावर आपला उदरनिर्वाह करीत. हिरडा या औषधी वनस्पतीची ते लागवड करीत असत. भूस्खलनाच्या दुर्घटनेबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबातील काही जवळच्या नातेवाईकांना आपला जीव त्यावेळी गमवावा लागला. हे सांगताना त्या आजींच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर भोगलेलं आभाळाएवढं दुःख आणि त्यातून आयुष्याला लागलेले चटके हे स्पष्ट जाणवत होते.

आम्ही त्या दोघांना धीर दिला व परतीच्या प्रवासाला गाडी वळवली. पुन्हा तो प्रवासातील चित्तथरारक अनुभव घेत आम्ही पुण्याच्या दिशेने कुच केली.

गाडीतून माघारी येताना माझं मन मलाच खात होतं. आपण माणसं किती स्वार्थी असतो ना! तासभर मोबाईलला रेंज मिळाली नाही तरी आपलं मन अस्वस्थ होतं. पण इथे दूरवर डोंगरात वीजसुद्धा फार दुर्मिळ रित्या पोहोचते. इथल्या नागरिकांचं जीवन पाहिलं की आपण शहरात राहणारी माणसं किती सुखात जगतो आहोत याची प्रचिती येते. हवी असणारी एखादी गोष्ट दुसऱ्या क्षणाला मिळणाऱ्या आपल्या या तांत्रिक जीवनात खरं सुख नि खरं दुःख काय, हेच विसरून गेलो आहोत आपण.

त्या माळीण गावातील लोकांचं जीवन पाहिलं तर, राहायला चार भिंतींचं छोटंसं घर, पोट शेतीवर अवलंबून असलेलं—तेही अशा ठिकाणी जिथे आपत्तींची पुनरावृत्ती ठरलेलीच. जीव हाताच्या मुठीत घेऊन, नऊ वर्षांपूर्वीच्या अग्निदिव्यातले चटके मनावर झेलत, पण तरीही प्रामाणिकपणाचं, आपुलकीचं आणि समाधानाचं स्मितहास्य चेहऱ्यावर वागवत हा खडतर जीवनप्रवास जगणं किती कठीण आहे! पण माणसं खरंच असं जगतात, हे तिथे प्रत्यक्ष भेट दिल्यावर उमगलं.

आपलं दुःख किती भव्य आहे, याचं भांडवल करत आपण आयुष्यातल्या नेमक्या आनंदाला आणि सुखाला मुकत चाललो आहोत…

आपलं जीवन हे टप्प्याटप्प्याने उलगडत जाणारं आणि प्रत्येक टप्प्यावर एक नवीन शिकवण, आत्मिक बळ देणारं वास्तव आहे. हीच शिकवण वेचत हे वास्तव रूपी जीवन मनात संवेदनशीलता राखत जगायला आलं पाहिजे…

(छायाचित्र :इंडिया टाइम्स )

वरील दोन्ही घटनांमधला काळ बदलला असला तरी दुर्दैवाने परिस्थिती तशीच आहे. ओली-चिंब स्वप्नं डोळ्यात घेऊन लोक मात्र कोरडं जीवन जगत आहेत. स्थलांतर होण्याच्या आश्वासनांकडे डोळे लावून बसले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने, तसेच सामाजिक न्याय व्यवस्थेने या विषयांवर फक्त चर्चा करून भागणार नाही. त्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अशा दुर्गम परिसराचा शोध घेऊन तेथील लोकांना तत्काळ हलवण्यात यावं. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, ज्यामुळे त्यांचं विस्कळीत झालेलं जीवन सुधारेल. अशा दुर्लभ परिसरांचा अभ्यास करून, असे अपघात टाळण्यासाठीचे उपाय अवलंबणं महत्त्वाचं आहे.

किमान तेथील जनतेला योग्य वीज आणि पाणीपुरवठा झाला पाहिजे. गोरगरीब जनतेच्या विकासासाठी, राज्याच्या लाडक्या बंधू-बहिणींसाठी प्रामाणिक निर्णय घेण्याची गरज आहे. नाहीतर श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातील आणि गरीब हा गरीब म्हणूनच मरेल! आधुनिक तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीने देश प्रगतशील होईल खरा, पण तो तेव्हाच समृद्ध आणि सजग होईल, जेव्हा इथे राहणारा प्रत्येक माणूस सुखाचा घास आणि समाधानाची झोप घेईल.

लेखाच्या शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते…

 

 

मी आरश्याचे फसवे पाहिले
मिरवून सुकलेले गजरे पाहिले…
एकांती रडणारे कैक हसरे पाहिले…!

गाजवले ज्यांनी बहुत रंगमंच
अशांचे मुखवटे उतरताना पाहिले…
सावरले ज्यांनी कैक संसार,
त्यांचेच घर ढासळताना पाहिले….!

– निनाद माळी ( पुणे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *