पुणे, ३ फेब्रुवारी २०२५

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान तिसरे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप २ फेब्रुवारी रोजी शोभायात्रेने झाला. या संमेलनाने मराठी भाषा आणि संस्कृतीला जागतिक स्तरावर महत्त्व दिले.

आज सर्वत्र एआयची चर्चा आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याचा प्रभावी उपयोग करायला हवा. एआय युगात स्मॉल लँग्वेज मॉडेलमध्ये सर्व महत्त्वाचे साहित्यिक लेखन संग्रहित केल्यास, भावी पिढीला साहित्यिकांच्या विचारधारेचा आणि त्यांच्या लिखाणाचा समग्र आढावा घेता येईल. त्यामुळे मराठी भाषा विभागाने एआयच्या मदतीने साहित्य जतन करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी.

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

संमेलनात विविध चर्चासत्रे, परिसंवाद, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले होते. ह्या दरम्यान पुणेकरांनी ५०,००० पुस्तकांचे आदान-प्रदान केले, त्यात ₹१० पुस्तक आदान-प्रदान कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.

पाई ग्रंथालयाच्या धनश्री साने म्हणाल्या, “हे फक्त पुस्तक बदलण्याचा उपक्रम नाही, तर विविध वयोगटांतील लोकांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान आहे.”

संमेलनाला भेट देताना फर्ग्युसन कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने सांगितले, “या संमेलनामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीचा गोडवा अनुभवता आला.”

समारोपाच्या दिवशी पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषेत, ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढली गेली, ज्यामध्ये मराठी कला आणि संस्कृतीच्या विविध पैलूंचे समाजाला दर्शन झाले.

मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले,


या संमेलनाने मराठी संस्कृतीला जागतिक मंचावर स्थान दिले आहे.

-उदय सामंत

संमेलनाच्या उद्घाटनाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित होते. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून त्यासाठी २ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

(विशेष: संमेलनाचा समारोप करणारा व्हिडिओ वर्ताहर च्या इंस्टाग्राम पेजवर उपलब्ध आहे.)
व्हिडिओ पाहा येथे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *