पुस्तकं सांगतात कथा ,
पुस्तकं मांडतात व्यथा,
पुस्तकं जाणतात गाथा,
भल्या बुऱ्या माणसाची…
अशीच काही माझी प्रिय दृष्टीकोन बदलणारी पुस्तकं…
पुण्यभूमी भारत- सुधा मूर्ती (मेहता प्रकाशन)
भारतीय माणसाचे वेगवेगळे पैलू जेव्हा सुधा मूर्तींच्या अनुभवातून समोर येतात, तेव्हा ह्या पुण्यभूमी भारताचा मी एक भाग आहे याचा अभिमान वाटतो. हे पुस्तक म्हणजे आयुष्याच्या निरीक्षणाच्या नोंदी आहेत. मला कधीही नैराश्य आलं ना की आतल्या काही ओळी आठवतात.
“प्रत्येक फुलाचं स्वतःचं असं खास सौंदर्य असतं. म्हणूनच आपल्याला दोन फुलांमध्ये कधी तुलना करता येत नाही. तसंच प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं खास वेगळेपण असतं. प्रत्येकाचे स्वतःचे गुण असतात ,वैशिष्ट्य असतात तसेच काही दोषही असतात. प्रत्येकालाच आपापल्या मर्यादा असतात पण या सर्वातूनही प्रयत्न करणं हे आपलं काम आहे.”
पुस्तकातील मर्यादा या भागातला हा संदेश माझ्या हारलेल्या मनाला लढण्याची प्रेरणा देतो.’तुमचा दृष्टिकोन जर चांगला असेल तर तुम्ही स्वतःभोवती स्वर्ग निर्माण करू शकता.’ या पुस्तकातल्या ओळी काहीतरी करून दाखवण्याची ऊर्जा देतात.
“मोर इतका सुंदर , दौलदार असतो पण त्याला उंच उडता कुठे येतं? कोकीळ काळा असतो ;पण त्याचा आवाज किती सुंदर! कोकिळाने कधी चार लोकांच्या नाचायला जाऊ नये आणि मोरा न कधी ताण मारू नये. आपण जे नाही ते भासवण्याचा कधीच प्रयत्न करू नये”.
बहाना या भागातला हा शेवटचा परिच्छेद माझी स्वतःच्या अस्तित्वाशी नाळ जोडून ठेवतो.
विद्रोही तुकाराम- डॉ. आ. ह. साळुंखे
संत हा शब्द धार्मिक दृष्टिकोनाशीच संलग्न आहे असं वाटणाऱ्या मला या पुस्तकातून तुकारामांच एक वेगळंच रूप समजलं. प्रतिभावंत ,भक्त आणि युद्ध या तिन्ही भूमिकांचा एकत्र मिलाफ झालेला महापुरुष- कवी तुकाराम, संत तुकाराम आणि विद्रोही तुकाराम.’ विद्रोही’ म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा उभारणारा. समाजात इकडे तिकडे चोहींकडे अन्यायाचे ठेकेदार लोकांना फसवत होते, छळत होते .त्यांच्या मोठ्या संख्येची परवा न करता त्यांच्यावर तुटून पडलेले ,किती लोकांचे वैर ओढवून घेतले . ज्या समाजात गोरगरिबांचे सन्मानाने जगण्याचे अधिकार पुढील नाकारले होते त्यांच्याशी लढण्याकरिता आपल्या क्षमता वापरण्याचा निर्णय घेत व्यक्तिगत कर्जाच्या वसुली ऐवजी कर्ज खाते इंद्रायणी मध्ये बुडवून , विशाल अशा बहुजन समाजाच्या अधिकाऱ्यांची वसुली करणारा विद्रोही तुकाराम मला भारावून टाकतो.
‘द मदर आय नेवर न्यू ‘- सुधा मूर्ती (penguin books)
अचानकपणे घडणाऱ्या बऱ्याचश्या गोष्टी आपल्याला संभ्रमात टाकतात. मन सैरभैर करून सत्याच्या शोधाचा प्रवास करणाऱ्या दोन पात्रांच्या दोन भिन्न कथा या पुस्तकांमध्ये आहेत. पुस्तकाचे शीर्षक इतके गूढ आहे की वाचक त्यात पूर्णपणे गुंतून जातो. तो कधी पात्राशी एकरूप होतो आणि त्याच्या भावना व गोंधळ स्वतःचा वाटू लागतो, हे त्यालाही कळत नाही.मग वाचकही प्रवास करू लागतो या शीर्षकाच्या शोधात ते म्हणजे ‘ द मदर आय नेव्हर न्यू’ .सरते शेवटी मातृत्वाची एक वेगळीच व्याख्या मला हे पुस्तक शिकवून गेले जी खरंच मला कधीच उमगलेली नव्हती.