मी नववीच्या वर्गाचा वार्षिक परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना देत होते.वर्गात दुसऱ्या क्रमांकाने पास झालेला विद्यार्थी निकाल न्यायला आलाच नाही, मला त्याची खूप काळजी वाटत होती. ९.३० वाजता पालकांसाठी निकाल देण्याचे माझे काम सुरू होते.
कचरा वेचणारी आई
केस अस्ताव्यस्त विस्कटलेले,मळकट विरलेली साडी नेसलेल्या एक बाई माझ्याकडे लगबगीने आल्या व मला म्हणाल्या,
“म्या अशोक जोगदंड ची आय हाय. त्याच पास नापास कार्ड देतायसा का तेवढं?”
मी म्हणाले “अशोक नाही आला का?”
त्यावर त्यांनी उत्तर दिले “मामाकड धाडल त्याला आमच्या हितली वस्ती नाय बराबर मॅडम, बाप काय बी काम धंदा करत नाय निस्त दारू ढोस्तोय. म्होरल वरीस १० वीचं हाय. मामाची पोरं शिकली हायेत त्यांच्या नादान जरा बुक वाचील. म्या दिसभर कचरा गोळा करतिया तवा कुठ पोटाला घास घावतूया.”
मी त्यांना अशोक चा निकाल दिला तशी त्या म्हणाल्या,
“पोर पास हाय नव्ह?
मला काय मेलीला कळत नाय बघा.”
मी म्हणाले, “तो नववीच्या चारी तुकड्यांमध्ये दुसरा आला आहे व गणितात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.“
“म्या आलेच” म्हणत त्या लगबगीने निघून गेल्या. थोड्या वेळाने त्यांनी माझ्या हातावर एक पुडी ठेवली व म्हणाल्या,
“मॅडम पेढ आणायला पैक नव्हत म्हणून वाईज गूळ आणलाय.”
त्या दिवशी त्या गुळाची चव मला पेढ्या पेक्षाही भारी वाटली. कचरा वेचून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी ती आई मला खूप श्रीमंत वाटली.
स्वाईन फ्ल्यूच्या संकटात आईचे काळजीवाहू प्रेम
जून मध्ये शाळा सुरू झाली. १० वी अ ची वर्गशिक्षिका मीच होते. अशोक पहिल्या दिवसापासून शाळेत मनापासून अभ्यास करू लागला. सगळे कसे अलबेल होते. तेवढ्यात स्वाईन फ्ल्यूचे संकट आले. अशोकच्या आई शाळेत आल्या व मला म्हणाल्या,
“मॅडम ह्यो कसला आजार हाय,काय काळजी घ्यायला पाहिजे,खायला काय द्यायला पहिज?”
आणि खरंच स्वतः च्या पोटाला चिमटा घेत मुलाला खाऊ घातले, आजार होऊ नये म्हणून काळजी घेतली.
आई शब्दावर अशोकचे हृदयस्पर्शी विचार
मी ऑफ तासाला विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबवित असे. “विचारांना फुटू देत पंख ” या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण व दडपण कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढत असे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना एखादा शब्द देऊन ठराविक वेळ देऊन त्यांना विचार मांडण्याची संधी मिळत असे. एक दिवस मी “आई” शब्द दिला. त्यावेळी अशोक ने मांडलेले विचार,
“मी पाचवीत असताना माझ्या लक्षात राहिलेला दसरा. मी पाटी पाहिजे म्हणून आई जवळ हट्ट धरलेला. आईने दसऱ्याच्या आदल्या दिवशीच भरपूर कचरा गोळा केला होता. त्यामध्ये आईला फुटलेली पाटी सापडली. तिने ती स्वच्छ धुवून पुसून मला दिली. मी त्यावर आनंदाने सरस्वती काढली. तिची पूजा केली. तेव्हा पासून सरस्वती माझ्या पाठीशी आहे.
पूजा झाल्या नंतर चे आईचे शब्द माझ्या कानात कायम ऐकू येतात, जे मिळेल त्यात आनंद मान कायम सुखी होशील. जे तुझ्याकडे नाही त्याचा विचार करू नको नाहीतर दुःखी होशील. माझी आई मला फार आवडते. आमच्या वस्ती मध्ये कोणाच्याही घरी कितीही मोठे संकट आले तरी आई त्यांच्या मदतीला कायम धावून जाते. मला कायम ऊर्जा, उमेद व ताकद देणारी आई, माझ्या अपयशात, पराभवात माझ्या सोबत राहणारी आई, कायम इतरांसाठी जगणारी माझी आई मला खूप सुंदर वाटते.”
अशोक चे आई बद्दलचे विचार ऐकून सर्वांचे डोळे भरून आले. अशोक ला १० वी च्या परीक्षेत उत्तम गुण मिळाले. त्याने ११ वी ला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.
सात आठ महिन्यांनी अशोक ला त्याच्या आईने कानाला धरून शाळेत आणले होते. त्यांनी रुद्रावतार धारण केला होता. त्या म्हणाल्या,
“मॅडम मी अशोकच्या कॉलेजात गेली होती, त्याच्या मास्तरांना भेटायला तवा मास्तर म्हणाल ह्यो तासाला बसत नाही. नापास झालाय सहामाहीत. म्या दिसभर कचरा उचलतीया, कचऱ्याच्या वासान जीव नकोसा झालाय. ह्याला तुमीच समजावा मॅडम.”
मी अशोकला समजावले, तेव्हा त्या जाताना हसत हसत घरी गेल्या.
एक दिवस माझ्या दारावरची बेल वाजली. मी दार उघडले तर समोर स्मार्ट मुलगा उभा होता. मी काही विचारायच्या आधीच त्याने बोलायला सुरुवात केली,
“मॅडम मला ओळखला का? मी अशोक जोगदंड इंजिनिअर झालोय. चांगल्या कंपनीत नोकरी करत आहे. तुमच्या साठी खाऊ व साडी आणली आहे.आई सारखी तुमची आठवण काढते.”
मला अशोकला भेटून खूप आनंद झाला. कचरा वेचणाऱ्या अशोकच्या आईमध्ये मला सावित्रीबाई, जिजाबाई, श्यामची आई, सरस्वती यांचे पदोपदी दर्शन झाले.
सौ.सीमा पोपटराव चव्हाण
माजी मुख्याध्यापिका,
डॉ वसंतदादा पाटील,माध्यमिक विद्यानिकेतन
शुक्रवार पेठ, पुणे