‘तरुणाई’ म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक बहराचा काळ मानला जातो. प्रत्येक पिढी या टप्प्यात जगाला उलथून टाकण्याची स्वप्ने पाहत असते, कारण मनगटातील ताकदीवर त्यांचा विश्वास असतो. केवळ हेच कारण नव्हे, तर काहीतरी जगावेगळे करून दाखवण्याची दुर्दम्य मनीषा आणि पराकोटीचे साहस करून दाखवण्याची आस लागलेले हे ‘तुफानी’ वयच तसं असतं!
म्हणूनच ज्या देशांत अशा तुफानी वयातील युवक मंडळी संख्येने अधिक असतात, तो ‘तरुणांचा देश’ ठरतो. बलाढ्य आणि सशक्त लोकशाही, मोठ्या संख्येने असलेला युवकवर्ग, इंग्रजी भाषेचा व्यवहारात उपयोग करू शकणारा जगातील दुसऱ्या क्रमांकावरील देश, खोलवर रुजलेली संस्कृती-मूल्ये-आदर्श, उन्नत आध्यात्मिक जाण आणि जगाला वेगळा विचार देण्याची क्षमता ही भारताची बलस्थाने आहेतच.
शिवाय कुशल मनुष्यबळ, नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची कुवत आणि त्याचा दैनंदिन जीवनात वापर करण्याची अफाट क्षमता व मानसिक लवचिकता अशा अनेक सकारात्मक कारणांमुळे भारत २०५० पर्यंत महासत्ता होईल, असे भाकीत अनेक तज्ज्ञ करत आहेत. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार २०२९ साल उजाडेल, तेव्हा भारत हा जगातील सर्वात ‘तरुण विकसनशील देश’ ठरेल, असे नुकतेच वाचनात आले. म्हणजे त्या सुमारास आपल्या देशातील सरासरी वय (सांख्यिक परिभाषेत ‘मीडियन’) फक्त २९ वर्षे असेल, हेही तो अहवाल सांगतो.
त्या वेळी इतर विकसित देशांतील सरासरी वय काय असेल, या बाबींचा तपशीलही त्यात आहे. आणखी पंधरा वर्षांनी अमेरिका, जपान, कॅनडा आणि बहुतांश युरोपीय देश यांचे सरासरी वय ४० वर्षांहून अधिक असेल. ‘ब्रिक्स’ राष्ट्रांपैकी रशिया आणि चीनदेखील चाळीशीच्या आसपास म्हणजे आपल्यापेक्षा दहा वर्षांनी जास्त असेल. ब्राझीलचे सरासरी वय साधारणतः ३४ वर्षे असेल.
हा अंदाज आधारभूत मानल्यास आणि तो खरा ठरल्यास, आज देशभरात जी मुले प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या टप्प्यात आहेत अथवा शालांत टप्प्यावर येऊन उभी आहेत, त्यांना कसे घडवायचे याचा पूर्ण आराखडा तपशीलासह येत्या दोनेक वर्षांत आपल्यासमोर तयार असायला हवा. तसेच त्याच्या अंमलबजावणीचे टप्पे ठरवून वाटचाल करताना आपल्या प्रगतीचे वेळोवेळी पुनरावलोकन करून त्यात सुधारणा करणे हे पहिले आव्हान आज आपल्या देशासमोर आहे.
तंत्रज्ञानाच्या युगातील संधी आणि आव्हाने
जगभरात तंत्रज्ञानाने गेल्या दहा ते पंधरा वर्षांत जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे माणसाच्या जगण्याची सारी परिमाणेच बदलून गेली आहेत. इलेक्ट्रॉनिक युगदेखील फारतर दहा-बारा वर्षे टिकेल, असे म्हटले जाते. डिजिटल तंत्रज्ञानाने आज सर्वत्र मोठी आघाडी घेतली आहे. संगणक, आंतरजाल, भ्रमणध्वनी अशा अचाट वेगाच्या तंत्रज्ञानामुळे विश्वातील संपर्ककक्षा झपाट्याने बदलत आहेत.
माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्ञानाचा महासागर अगदी सहज कवेत घेता येईल, ही आजची वास्तवता आहे. सध्याच्या उपलब्ध ‘माहिती प्रणाली’तील नव-नवी ‘सर्च इंजिन्स’ मानवाला भूतकाळातील घडामोडींची उकल करून दाखवतातच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आंतरजालातील हे ज्ञानकोश मानवाच्या मनात भविष्याच्या वेधांची आवर्तने क्षणोक्षणी निर्माण करतात.
‘असाध्य’ किंवा ‘अशक्य’ असे काहीही नसते, हे पुनःपुन्हा अधोरेखित होत आहे. आणि या बदलांचा वेग मानवाला दररोज ‘भविष्याची चाहूल’ देत आहे. ‘स्थूलाकडून सूक्ष्माकडे’ मानवाचा प्रवास सुरू झाला आहे. इथून पुढे येणारी शंभर वर्षे ‘नॅनो’ तंत्रज्ञानाची असतील.
नवीन भारतासाठी पावले उचलण्याची गरज
भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ‘पेटंट’ म्हणजेच ‘बौद्धिक संपदा हक्क’ आणि ‘स्वामित्वहक्क’ या संदर्भात जागतिक पातळीवर आपण आजही खूपच पिछाडीवर आहोत. हे वास्तव आहे. पारंपरिक चौकटीतील विचारधारा सोडून अगदी वेगळा विचार करण्याची निर्मिती करणारी मनं आपल्याला घडवावी लागतील.
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नावीन्यपूर्ण शोध लावणे आणि त्याकरिता अर्थसंकल्पीय तरतूद करणे, हे आपल्या शासनापुढील दुसरे आव्हान आहे. कोणतेही नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आज जगभरात भारतीय माणूस आघाडीवर आहे. मग तो संगणक वापर असो, आंतरजालाशी दोस्ती करणे असो किंवा मोबाईलचा वापर असो—ही लवचिकता आपल्या रक्तात कशी भिनली आहे, याचा मागोवा घेणे हा रोचक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल.
आजच्या तरुणाईला नुसते मोकळे आभाळ दाखवून भागत नाही, तर त्यांच्या मनात ‘कुतूहलाचे अंतराळ’ जागे ठेवावे लागेल. त्यांना सतत प्रेरणा मिळत राहील, असे वातावरण निर्माण करणे; त्यांनी जागेपणी पाहिलेल्या स्वप्नांना सत्यात आणण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे; सतत प्रयोगशील राहण्यासाठी कार्यरत ठेवणे—हे तिसरे मोठे आव्हान सध्याच्या शिक्षण व्यवस्थेपुढे आहे.
तरुणाईच्या जोशाला योग्य दिशा देण्याची गरज
उद्योग, शासन आणि शैक्षणिक संस्था यांच्या समन्वयातून उद्याचा भारत घडेल. मोठ्या उद्योगांना पूरक कौशल्यांची निर्मिती व्हावी, या दृष्टीने औद्योगिक तंत्रशिक्षण (आय.टी.आय.) आणि तंत्रनिकेतन संस्थांनी आपल्या अभ्यासक्रमात अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे.
देशाला पुढे नेण्यासाठी उच्चशिक्षित संशोधक लागतातच. अशा तंत्रज्ञांमुळेच आपली मंगळ मोहीम कमीत कमी खर्चात यशस्वी होऊ शकली. त्याचबरोबर लाखो रोजगार देणारे कौशल्य निर्माण करण्यावरही भर दिला जात आहे.
तंत्रज्ञानविषयक उच्च शिक्षण घेऊन जगभर आपला ठसा उमटवणारे भारतीय युवक परदेशांत रमले आहेत. परंतु त्यांना भारतात परतून येण्यासाठी ठोस योजना आखणे आणि भारताला महासत्ता बनविण्यासाठी त्यांच्या देशप्रेमाला आवाहन करणे, हे चौथे आव्हान आहे.
भारत आज महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘इन्व्हेस्ट अँड ग्रो’ ही विचारसरणी आपल्याला ‘वन इंडिया-विन इंडिया’कडे नेईल, यात शंका नाही. म्हणूनच तरुणाईच्या तुफानाला योग्य दिशा देणे ही काळाची गरज आहे.
– शेखर जोशी (लेखक व्यवस्थापन सल्लागार आहेत)