छायाचित्र -The Polis Project

(“चिन्हात राष्ट्र मावत नाही” ही कविता केवळ शब्दांची रचना नाही, तर समाजाच्या वेदना, राजकारणाच्या खेळ आणि सामान्य माणसाच्या संघर्षाची साक्ष आहे. निनाद माळी यांनी स्वतःच्या आवाजात ही कविता साकारली आहे, ज्यामुळे प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श करतो. ऐका, जाणून घ्या आणि विचार करा…)

चिन्हात राष्ट्र मावत नाही

निपक्षतेचे बंध निसटले
अन्यायाच्या सुया टोचल्या
निष्पापांच्या जिवावरती
लाल दिव्याच्या गाड्या सुटल्या..!

मतमतांच्या खेळामध्ये
प्याद्यांचेही मोल शिणले
लाचाऱ्यांच्या ढिगाखाली
न्यायाचे दरवाजे दबले…!

पुण्यायीच्या पुण्य भूमीत
दिवस काळा तो उगवला
संस्कृतीचा डौल मिरविता
‘दादा’ आता ‘भैया’ झाला…!

दावा होता खुर्ची साठी
जो तो सदऱ्यात उभा राहतो
अवाहनांच्या शब्दांमधून
भारत उद्याचा दाखवत राहतो..

बेरोजगारीच्या विळख्यात
माझा तरुण आज झिजत चाललाय
काळया मातीत रमणारा
गळी फास कवटाळू लागलाय..

हे राष्ट्र देवतांचे म्हणत,
कैक पिढ्या निघून गेल्या
समाजकारणाचा चिखल पाहत
पापण्या आता भिजत चालल्या..!

जड झाले खिसे प्रजेचे
तरी प्रश्न काही संपत नाही
विकास हा भावनेतून होतो…
चिन्हात राष्ट्र मावत नाही..!

🎧 कविता ऐकण्यासाठी इथे क्लिक करा:
चिन्हात राष्ट्र मावत नाही

✍कवी: निनाद माळी
🎙 कवितेचा आवाज: निनाद माळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *