मी अनेक गडांवर ऐतिहासिक वारसा उघड्या डोळ्यांनी पाहतो. इतिहासाची आवड आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मी तिथे भेट देतो.मात्र, तिथे येणाऱ्या अनेक पर्यटकांकडे जेंव्हा मी पाहतो, तेव्हा फार वाईट वाटते. कारण त्या ठिकाणचे महत्त्व किंवा पावित्र्य जपताना ते दिसत नाहीत. अनेक तरुण केवळ प्रसिद्ध फोटो पाहून त्या जागी पोहोचतात.काही युवा तर केवळ प्रसार माध्यमांवर एक भारी फोटो पोस्ट करता यावा म्हणून तिथे जातात. त्यांना त्या ठिकाणाची काहीच माहिती नसते हे दुर्दैवी आहे. फोटो काढण्यात काही गैर नाही, पण ठिकाणाची साधारण माहिती तरी असायला हवी.
वेरूळच्या लेण्यांमध्ये अनेक गुहाशिल्पे आहेत. मात्र, 90% पर्यटक फक्त समोरच्या कैलास मंदिराला भेट देतात आणि परत जातात. आपण ठिकाण फिरलो या भ्रमात मागे फिरतात. खरे कोरीव शिल्प प्रसंग तर इतर सर्व गुहांमध्ये आहे पण ते कोणाला पहायचे नसते.स्वराज्याची राजधानी असणाऱ्या राजगडावरही असेच होते. त्याचे एक एक अवशेष पाहण्यासाठी दिवस जातो. परंतू त्याला भेट द्यायला येणारे कित्येक उत्साही पर्यटक माथ्यावर येऊनच मागे फिरतात.हे मी स्वतः अनुभवले आहे.
गडकोट संरक्षण: आपली जबाबदारी
इतिहासाची जाणीव नसल्याने अनेक पर्यटक ऐतिहासिक स्थळांवर बेजबाबदार वागताना दिसतात.काही जण अश्लील कृत्ये करतात, व्यसनासाठी हे ठिकाण अड्डे बनवतात किंवा परिसरात कचरा टाकतात. कोणताही गड हा स्वराज्यासाठी रक्ताने पुण्य झालेली भूमी आहे. इतकीही समज हल्ली शिल्लक राहिलेली दिसत नाही. ही स्थिती बदलण्यासाठी प्रभावी शिक्षण आणि कठोर नियमांची गरज आहे. दुर्दैवाने, सरकारकडून ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व पटवून देणारे कोणतेही ठोस उपक्रम राबवले जात नाहीत, ना चुकीच्या वर्तनावर कठोर कारवाई होते.आजकाल ” ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणारे बहुतांशी लोक केवळ दिखाउपणाच करण्यासाठी आलेला एक वर्ग असतो ” याची जाणीव सद्यस्थितीत एक इतिहासप्रेमी म्हणून वारंवार होत राहते.
सह्याद्रीच्या कुशीत उभे असलेले गडकोट म्हणजे आपला अभिमान, आपली ओळख! पण गेल्या कित्येक वर्षांपासून या गडकोटांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हे पाहून मन अस्वस्थ होतं. सरकार येत-जात. सरकार येण्यासाठी महाराजांच्या नावाचे राजकारण चालते पण पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या गडसंपत्तीचे जतन व्हावे.हा इतिहास पुढील पिढ्याना सुपूर्त व्हावा, ही भावना मात्र कोणत्याही सरकारची दिसत नाही. पुढच्या पिढ्यांना हा ऐतिहासिक ठेवा जपून द्यावा, यासाठी कोणीच गंभीर दिसत नाही.ही उदासीनता नवी नाही. इंग्रजांनीही हेच केलं होतं.या गडकिल्ल्यांसाठी झुंजलेल्या पराक्रमी पूर्वजांचा इतिहास या लोकांना समजला, तर ते अपल्याचविरोधात पेटून उठतील.स्वातंत्र्यासाठी बंड करतील याची दूरदृष्टी कल्पना इंग्रजांना होतीच.म्हणूनच त्यांनी गडांकडे जाणारे मार्ग उध्वस्त केले, तिथली रक्षणव्यवस्था मोडली आणि लोकांना त्यांच्या इतिहासापासून तोडून टाकलं.काळ पुढे सरकला इंग्रज निघून गेले. राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही स्थापित झाली.दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतरही हे चित्र फारसं बदललं नाही. छत्रपतींच्या नावाने राजकारण झाले पण त्यांचे गडकोट एक ऐतिहासिक पवित्र वारसा म्हणून जपला जावा यासाठी म्हणावे तसे प्रयत्न तीनशे वर्षात सरकारमार्फत झाले नाहीत हे सत्य नाकारता येत नाही !
सध्या प्रसारमाध्यमांनी माणसाच्या जीवनात महत्त्वाची जागा मिळवली आहे. आता लोक भटकंती करताना आपल्या अनुभवांची माहिती प्रसारमाध्यमांवर शेअर करतात, त्यामुळे अनेक गडकिल्ले प्रकाशझोतात येत आहेत. दुर्गप्रेमींनी गडकोटांना भेटी देण्याचे प्रमाण वाढले आहे, आणि त्यातून गडसंवर्धनाची चळवळही उचल खात आहे. शिवप्रेमी मोठ्या प्रमाणावर या गडकिल्ल्यांचे जतन व्हावे अशी मागणी करत आहेत, पण दुर्दैवाने सरकार अजूनही याकडे फारसे लक्ष देताना दिसत नाही.अशा वेळी अनेक स्थानिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. गडसंवर्धन ही केवळ मागणी न राहता, त्यांनी स्वतःच गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज अनेक किल्ले सुस्थितीत आहेत आणि गडभ्रमंतीसाठी सज्ज झाले आहेत. पण ही जबाबदारी काही मोजक्याच लोकांची नाही, ती आपली सगळ्यांचीच आहे. आपणही गडकिल्ले जपण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, त्यांचे संरक्षण आणि स्वच्छता यामध्ये योगदान द्यायला हवे.
दुर्गभ्रमंती का करावी?
“दुर्गभ्रमंती का करावी?” असा प्रश्न पडल्यास त्याचं उत्तर फार सोपं आहे—आपण आज सुख उपभोगतो आहोत ते कोणामुळे? आपलं अस्तित्व टिकून आहे, ते कुणाच्या त्यागामुळे? कुणाच्या पराक्रमामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील, तर दुर्गभ्रमंती करायलाच हवी!
छत्रपती शिवरायांचं तेजस्वी कर्तृत्व साडेतीनशे वर्षांनंतरही तितकंच प्रभावी आहे. त्यांच्या दूरदृष्टीची, शौर्याची आणि नेतृत्वगुणांची थोडीशी जरी झलक अनुभवायची असेल, तर गडकोटांचा अभ्यास करायला हवा. केवळ गड पाहण्यापुरतं नव्हे, तर तो समजून घेण्यासाठी तिथे जायला हवं!
गडरहाळातील सामान्य लोक, त्यांचे जीवन ,गडावरील वास्तूशास्त्र आपल्याला इतिहासाचे दर्शन घडवत असतात. गड चढताना आपला शारीरिक कस आजमवला जातो. इतर सहलींमध्ये मोठा खर्च येतो, पण गडकोट भ्रमंती तुलनेने कमी खर्चिक असते. इथे निसर्गाचा सहवासही मिळतो आणि इतिहासाचं ज्ञानही. सध्या दुर्गभ्रमंती करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही बाब जशी आनंददायी आहे, तशीच चिंताजनकही आहे. काही ठिकाणी प्रचंड गर्दीमुळे अवशेषांची नासधूस होत आहे. हा वारसा नेस्तनाबूत होईल की काय, ही भीती सतत वाटते. म्हणूनच, गडकोटांना भेट देताना केवळ तिथे जाणं महत्त्वाचं नाही, तर तो वारसा जपणं, संवर्धन करणं आणि पुढच्या पिढ्यांसाठी तो टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे!
गडकोट फक्त दगड-मातीचे किल्ले नाहीत, ते आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष आहेत. या गडकोटांचे संवर्धन आणि जतन करणे ही जशी सरकारची जबाबदारी आहे, तशीच ती आपलीही आहे. दुर्गसंवर्धनासाठी अनेक स्थानिक संस्था आणि दुर्गसेवक अविरत मेहनत घेत आहेत. त्यांना गरज आहे ती केवळ सरकारच्या सहकार्याची !
महाराष्ट्रात आजही सुमारे तीनशे गडकोट अस्तित्वात आहेत. त्यातील काही ढासळले आहेत, तर काही इतिहासाच्या ओघात अपरिचित झाले आहेत. आपण हे मान्य करतो की सर्व गड पूर्ववत उभे करणं शक्य नाही, पण जे संवर्धन आणि डागडुजी शक्य आहे, ती सरकारने प्राधान्याने करावी.गडकोट संवर्धन म्हणजे केवळ दगड-मातीचा जपणूक नव्हे, तर आपल्या इतिहासाचा सन्मान आणि पुढील पिढीला त्यांच्या शौर्याचा ठेवा सुपूर्त करण्याची जबाबदारी आहे. इतिहास केवळ पुस्तकात ठेवायचा की मनातही रुजवायचा? या प्रश्नांची उत्तरं शोधायची गरज आहे. कारण आपण आज जागरूक झालो, तरच हे गड उद्या टिकून राहतील!
गडसंवर्धनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी (@admin_adya) इथे क्लिक करा