छायाचित्र- ehn.org

स्वच्छतेमागचं अस्वच्छ सत्य!

आपल्या घरातून निघणारा कचरा आपण सहज बाहेर टाकतो. त्यानंतर तो कचरा कुठे जातो, कोण उचलतं, काय होतं – याचा आपण विचारही करत नाही. स्वच्छता ही आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे, पण त्यामागे उभं राहिलेलं वास्तव आपण ओळखतच नाही.

दररोज शहरातून सुमारे १६००-१७०० टन घनकचरा उचलला जातो. यासाठी यंत्र वापरली जातात असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात त्या ढिगाऱ्यांत हात घालणारे असतात – माणसं. हे माणसं म्हणजे मजूर, सफाई कर्मचारी – जे आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी आपलं आरोग्य, आयुष्य आणि कधी-कधी स्वाभिमानही पणाला लावतात.

एका सफाई कर्मचाऱ्याने सांगितलं.

जर तुम्ही कचरा वेगळा केला, तर आमचं काम थोडं सोपं होतं. आम्हालाही आवडत नाही असल्या ठिकाणी काम करायला. आम्ही ज्या हातांनी कचरा उचलतो, त्याच हातांनी जेवण घ्यावं लागतं.”

या शब्दांत केवळ तक्रार नाही, तर अस्वस्थ करणारी एक खोल सामाजिक वेदना आहे.

या सफाई कामगारांना मास्क, ग्लोव्हज, बूट, किंवा कोणतीही सुरक्षा साधनं दिली जात नाहीत. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कुणाचीच वाटत नाही. यामुळे त्यांना त्वचेचे विकार, श्वसनाचे त्रास, डोळ्यांचे आणि सांधेदुखीचे आजार होत राहतात. पण हे आजार नोंदले जात नाहीत, कारण त्यांचं अस्तित्वच जणू अदृश्य मानलं जातं.   

 

प्रशासन अनेकदा आकडे दाखवतं – किती टन कचरा उचलला गेला, किती वस्ती स्वच्छ झाली, किती मोहिमा राबवल्या. पण त्या आकड्यांमध्ये ही माणसं कुठेच नसतात. यांना ना सन्मान मिळतो, ना सुरक्षितता, ना आरोग्यसेवा.

या पार्श्वभूमीवर ‘Voices from the Waste’ ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली आहे. या चित्रफितीत मी सफाई कामगारांच्या रोजच्या आयुष्याचा अनुभव मांडला आहे – त्यांच्या व्यथा, कष्ट, आरोग्य समस्यांबरोबरच डॉक्टरांचे, अधिकाऱ्यांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मतही घेतले आहे.

ही डॉक्युमेंटरी त्यांच्या आवाजाला मंच देण्याचा प्रयत्न आहे – जो आवाज आपण कधी ऐकलेला नाही. त्यांचं जगणं, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या नजरेतून पाहिलेली “स्वच्छ भारत” ही संकल्पना खऱ्या अर्थानं समजून घेणं आवश्यक आहे.

स्वच्छ भारत मोहिमेचा विचार करताना आपण केवळ रस्ते, गल्ली, आणि सार्वजनिक ठिकाणं साफ दिसतात का यावर लक्ष केंद्रित करतो. पण त्यामागे काम करणाऱ्या जीवांची, त्यांच्या जीवनशैलीची कल्पना आपण कधी करत नाही.

हा प्रश्न केवळ कचऱ्याचा नाही – हा माणुसकीचा आहे.

जर आपण खरंच स्वच्छ भारत घडवू इच्छित असू, तर त्याच्या पायाात ‘स्वच्छता’पेक्षा आधी मानवतेचा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. क सफाई कामगार दिसला, तर त्याच्याकडे नजर टाकणंही आपल्याला जड जातं. पण त्याच माणसाच्या श्रमामुळे आपण आपल्या घरात, ऑफिसमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अनुभवतो.

Voices from the Waste ही डॉक्युमेंटरी तुम्हाला त्याचं आयुष्य समजून घेण्यासाठी एक संधी आहे. एक नजर त्यांच्या जगण्यावर टाका. त्यांचे अनुभव ऐका, त्यांचे डोळे पाहा – कदाचित तेव्हा तुम्हाला समजेल की स्वच्छतेमागे किती अस्वच्छ आणि उपेक्षित वास्तव दडलेलं आहे.

एकदा जरूर पाहा – Voices from the Waste.

कदाचित त्यानंतर, तुम्ही कचरा फेकताना थोडा विचार कराल –

आणि कचरा वेगळा करतानाही, मनात कुठेतरी थोडं माणूसपण जागं होईल.        

(photo credit-Alina munir )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *