( पूर्वी एक गाव होतं…जिथं पहाटेची बांग, मळणीचा गंध, आणि माणुसकीचा श्वास होता. श्री. के. आर. पाटील यांच्या कवितेतून उमटणारा हा गावपणाचा सुगंध, आठवणींच्या पावलांवरून आपल्याला परत त्या मातीशी नेतो.“निरोप मातीचा” – ही डॉक्युमेंट्री लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. मातीला दिलेला हा भावनांचा निरोप… तुमच्या मनात घर करून जाईल.)
पूर्वी एक गाव होता
आबाआज्या सांगत होता
पहाटेच्या पारी…
गाव जागा व्हायचा
खुराड्यातलं कोंबड्यानं…
बांग दिलं की,
गोठाही बोलायचा…
धुक्यात हरवायचा…
चुलवान पेटलं तसं
घरातलं दुध आटलं
वासुदेवाचं येणं व्हायचं
तराळणींचं खराटं फिरायचं
सुर्यनारायणाच्या साक्षीनं
आजीचं पाठवान तापायचं
पाठीवरचं पिसवाट घेवून
शाळंत मास्तराला गाठायचं
अडाणी वळणाचा रस्ता
दगड- शेणांत रंगायचा
शेतावरचं पाखरू हाकता
‘बा’ माझा झुरायचा…
धुण्यापाण्यात आईचा माझ्या
ओढयात पाय घसरायचा…
दुपार दारात आली की,
हेळवी.. कडकलक्ष्मी…
बैत्यात गाव जोडतांना
माणूसकी आटली नाही
खळ्यावरच्या मळणीची
सवय कधी सुटली नाही
झऱ्यातलं पाणी तेव्हा…
ओवीतली गाणी जेव्हा…
फेट्या-कासुट्यात फुलायचं
ढुंगाण जरि उघडं राहिलं…
गावपण मात्र जपायचं
आजी-आजोबांच्या संगतीत
किर्तन-भजनात रंगायचं
शाहिरी-तमाशात हसायचं
मातीतला जलुम सारा
मातीतचं मरायचं…
गावगाड्यातील आठवणीत
फक्त आता… म्हणायचं!
कवी – श्री. के. आर. पाटील