शिल्पकार: तुमच्या ध्येयांचा मार्ग शोधणारा तुमच्यातलाच कलाकार

तरुण या शब्दाची माझी व्याख्या अशी आहे, “जो आयुष्यातील शिकण्याच्या प्रवासातील अडचणींचा महासागर तरून जातो तो ‘तरुण’ असतो. जो या प्रवासात थकूनभागून उतरून जातो तो तरुण नसतो.” वय झाले, की अशा माणसांच्या आयुष्यातून शिक्षण वजा होते. त्या व्यक्तीला समाज ‘तुम्ही उतरणीला लागला आहात, तुमचं उतारवय झालंय, असं म्हणू लागतो.’ उत्तरायण सुरू झालं असं आपणही म्हणतो.

प्रत्येक जण स्वतःचा शिल्पकार असतो. मला आमच्या वर्गातला वयाने मोठा असा मित्र आठवतोय. अंगाने अगदी पहलवान होता. त्याला रस्त्यावरची ‘गो स्लो’ ही पाटी फार आवडत असे. त्यामुळे एकाच वर्गात दोन-दोन वर्ष सहज रमून जात असे. एकदा तोंडी परीक्षा घ्यायला दुसऱ्या वर्गातल्या बाई आल्या होत्या. त्यांनी याला एक चित्र दाखवलं आणि म्हटलं, “या चित्रातले पाय पाहून कोणता पक्षी आहे सांग.” या पठ्‌ठ्याने बराच वेळ विचार केला आणि म्हणाला, “ओळखता येत नाही बाई …” बाई म्हणाल्या, “ओळखता नाही येत? नापास झालास तू!… नाव काय तुझं?” याने आपले पाय बाईंना दाखवले आणि म्हणाला, “बघा, पाय माझे आणि तुम्हीच ओळखा माझं नाव..” हे सगळं तो आम्हाला सांगत असे. एकदा त्याचं प्रगतिपुस्तक पाहून त्याचे वडील त्याला म्हणाले, “गधड्या, इतिहासात नापास झालास?” तेव्हा हा शांतपणे म्हणाला, “तुमच्यामुळे मी नापास झालो. तुम्हीच तर म्हणाला होतात, तुला मोठं व्हायचं असेल तर भूतकाळाकडे मुळीच बघू नकोस… म्हणून मी इतिहासाचा अभ्यासच केला नाही!” पण या टारगट पोरानं एक पक्कं ठरवलं होतं, आपण पोलिस सबइन्स्पेक्टर व्हायचं… आणि खरंच अपयशाचे अनेक स्पीडब्रेकर ओलांडून हा सबइन्पेक्टर झाला. स्वतःचं भविष्यशिल्प त्याने मनात आधीच कोरून ठेवलं होतं.

या विषयावर विचार करताना मला जाणवतं, की विद्यार्थ्यांना घडविणारी आजची शिक्षण पद्धती त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित करते का? अलीकडे तर मुलांचे १० वी आणि १२ वी परीक्षेचे गुण ऐकून माझ्या मनातलं हे कोड सुटण्याऐवजी अधिकच अवघड होतं. ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं आहे, त्या क्षेत्रासंबंधी मिळेल तितकी माहिती मिळवणं गरजेचं असतं. बहुतांशी मुलं कुणीतरी सांगतंय म्हणून एखाद्या शाखेत प्रवेश घेतात. नंतर आलेल्या अपयशाने खचल्यावर ते इतरांना दोष देतात. अशा तरुणांना एकच सांगावंसं वाटतं, की आयुष्य तुमचं आहे, भविष्य तुमचं आहे. अभ्यास तुम्हाला करायचा आहे. कष्ट तुम्हाला करायचे आहेत. तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, इतरांना नाही. सगळ्या पालकांनी हे लक्षात ठेवायला हवं, की तुमच्या मुलांच्या भविष्याचा निर्णय त्यांनाच घेऊ द्या. मात्र त्या निर्णयाप्रत पोचण्यासाठी जी मदत लागेल, ती त्यांना देण्यासाठी सर्वतोपरी मदत करा.

फार वर्षांपूर्वी वाचलेली एक बोधकथा इथे सांगावीशी वाटते. समुद्रकिनारी एका छोट्याशा गावात दोन मैत्रिणी राहत असतात. चौथी-पाचवीतल्या या मुली रोज समुद्रकिनाऱ्यावर खेळत असतात, दोघींपैकी एक मच्छिमाराची म्हणजे कोळ्याची मुलगी असते, तर दुसरी श्रीमंत घरातली असते. एक दिवस खेळता खेळता अचानक कोळ्याची मुलगी म्हणते, “मला आता घरी जायला हवं.”

मैत्रिणीने कारण विचारल्यावर ती म्हणते, “मला माझ्या बाबांबरोबर मासे पकडायला जायचंय.”

 त्यावर मैत्रीण तिला म्हणते, “अगं, तुझे काका समुद्रात होडी उलटून वारले. तुझे आजोबादेखील वादळात सापडून देवाघरी गेले. मग तुला समुद्रात जायची भीती नाही वाटत?”

ती कोळ्याची मुलगी उत्तर देते, “तुझी आजी देवाघरी गेली तेव्हा कुठे होती?”

मैत्रीण म्हणते, “पलंगावर, घरात.”

“आणि तुझी मावशी?… तीही घरी, पलंगावरच ना? मग तुला नाही भीती वाटत घरात पलंगावर झोपायला?”

मित्रांनो, आपल्या मनातली भीती काढून फेकून द्या. उद्या जे व्हायचे असेल ते होईल. आज घाबरून मी घराबाहेरच पडणार नाही, असल्या आयुष्यात काहीही अर्थ नाही. आपल्या एका आयुष्यात किती वर्ष, दिवस, तास किती आहेत हे मोजत बसण्यात वेळ दवडू नका. त्यापेक्षा आजच्या दिवसात, या क्षणी मी काय करायला हवं आहे, मी कसा आणि किती आनंद घेऊ शकतो, याचा विचार करा.

स्वप्नांचा मार्ग: सकारात्मकतेने घडवा आपले भविष्य

आणखी महत्त्वाचं म्हणजे, अभ्यास करता करता आणि स्वतःला समृद्ध करता करता, आपण आपल्या आई-वडिलांशी, भावंडांशी आणि सहकाऱ्यांशी संवाद साधला पाहिजे.मित्र-मैत्रीण, नातलग, शेजारी, ओळखीचे आणि अगदी अपरिचित लोक—जे जे भेटतील, त्यांच्याशी जिवंतपणे बोलायला सुरुवात करा.प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत. मोबाईलचा हेडफोन कानाला लावून ‘डेड’ होणं टाळा. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेण्याची वृत्ती जोपासा. आजपासून आनंद द्यायला सुरवात करा. मग बघा, तो आनंद काही काळाने अनेक पटीने तुमच्याकडे परत येईल.

सकारात्मक विचार करत राहा आणि सकारात्मक जीवनशैली अंगी बाणवा. तुम्ही जसा विचार करता, तसंच होतं. त्यासाठी काय करता येईल? तुमचं स्वप्न एका मोठ्या कागदावर लिहा आणि तो भिंतीवर लावा. रोज सकाळी जागे व्हाल तेव्हा आणि रात्री झोपताना त्या कागदावर तुम्ही लिहिलेलं ते स्वप्न किमान दहा वेळा मोठ्याने वाचा. ते स्वप्न मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये सेव्ह होईल. एक दिवस ते खरं झालेलं असेल, यात शंका नाही. आणखी एक करायला हरकत नाही. आपल्या जवळच्या लोकांशी ते स्वप्न शेअर करा. स्व-निश्चयाची प्रक्रिया आपोआप सुरू होईल. तुमचा मेंदूच नव्हे, तर अवघ भोवताल त्या कामाला लागेल आणि मग ते स्वप्न तुमच्या हातून पूर्णत्वाला जाईल. पण त्यासाठी निश्चय करायला हवा. खूप वाचा. नियमितता राखा. जेवणंखाणं, अभ्यास, झोप, व्यायाम, खेळ, छंद या सगळ्या गोष्टींसाठी वेळ ठरावा. त्या वेळीच त्या त्या गोष्टी करा. तुम्ही खऱ्या अर्थान स्वार्थी असाल, तर वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी टाळा. आपलं स्वप्न खरं करायचं असेल तर पूर्ण स्वार्थी व्हा….

आता तुमच्या मनात असेही विचार येतील, की जगात केवढी स्पर्धा आहे! समाजात, देशात, जगात वाईटसाईट गोष्टी घडत आहेत. हे असे नकारात्मक विचार जेव्हा जेव्हा येतील, तेव्हा ते ताबडतोब थांबवा.मी ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण होणारच, असा सकारात्मक विचार करायला सुरवात करा. कारण आपणच असतो आपल्या आयुष्याचे शिल्पकार.

“शिल्प घडवावे लागते. ज्यांच्या मनात अपार उमेद असते, ज्यांच्या मनात मोठे स्वप्न बसते, तेच सुंदर शिल्पाची  निर्मिती करू शकतात. या उमेदीला, या स्वप्नाला वयाचं बंधन नसतं. अशा व्यक्ती तरुण असतात. त्यांचे मन आयुष्यभर ताजेतवानेच राहते.”

 – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *